__________________दिवाकर चौकेकर_____सहा गझला_______________


1.

आले चुकून पाणी डोळ्यात सांजवेळी;
भलतीच आणिबाणी डोळ्यात सांजवेळी.

झाले प्रयत्न सारे विसरून जावयाचे;
पण तरळते कहाणी डोळ्यात सांजवेळी.

धावा कसा करावा आता मला कळेना;
झरते अभंगवाणी डोळ्यात सांजवेळी.

असतो प्रयास माझा दुःखास झाकण्याचा;
उरते तरी निशाणी डोळ्यात सांजवेळी.

बघ पापणीत माझ्या येऊन थांबलेली,
ही आसवे शहाणी डोळ्यात सांजवेळी.

मी आठवू कशाला ती कालचीच घटना;
झाली जुनी पुराणी डोळ्यात सांजवेळी.

2.

वेदनेला ती उराशी माळते;
मी जसा आहे तसा सांभाळते.

खूप काही कौतुकाने सांगते;
खूप काही बोलण्याचे टाळते!

प्रेम करते का कुणी दुःखावरी;
ही शहाणी त्याचवरती भाळते.

धीट ती आहे तसे मी जाणतो;
मात्र अश्रू एकट्याने ढाळते.

हा "दिवाकर" हार आता मानतो;
जीव इतका ती स्वतःचा जाळते.

3.

खांद्यावरच्या पदराला ती बोटावरती बांधत असते;
जणू काय ती ह्या चाळ्यांनी दोन जिवांना सांधत असते.

रागलोभ अन् हेवेदावे इथे न चुकले कधी कुणाला;
विकार असले उखळामध्ये टाकून आता कांडत असते.

तिच्यामुळे ह्या घरास माझ्या घरपण आले उघड सत्य हे;
तिची नोकरी सांभाळुन ती घरात सुद्धा रांधत असते.

इथे तांबडे फुटण्याआधी जुंपुन घेते रोज स्वतःला;
असे खपोनी घरास अमुच्या नीटनेटके मांडत असते.

तिला न जमले कधी कुणाशी वाद घालणे भांडण करणे;
पण नियतीशी ती एकाकी झुंजत असते,भांडत असते!

अता न उरली मला काळजी "दिवाकराच्या" संसाराची;
विष्णू संगे जशी लक्षुमी तशी इथे ती नांदत असते.

4.

दिव्यातील जळती जणू वात आहे;
उभा जन्म माझा असा जात आहे.

कसा दोष देऊ ? जगाला तरी मी;
उन्हाळाच  माझ्या नशिबात आहे.

पुन्हा जातवारी करू आज आता;
इथे  बेइमानी  नवी  जात  आहे.

जरी  चेक  नाही  इथे  बादशाला;
तरी जग म्हणाले तुझी मात आहे.

तिथे लाख त्यांना मिळो मान मोठा;
' दिवाकर ' इथे ही गझल गात आहे.

5.

कशास रोज रोजचे असे इथे मरायचे;
असेच दुःख पोळते इथे किती सहायचे.

करून टाक मोकळे तुझ्या मनात काय ते;
कशास आसवात या घडी घडी भिजायचे.

करू नकोस याचना उगीच ह्या जगापुढे;
भिकारड्या जगास ह्या तुलाच खूप द्यायचे.

घरी अता जरी तुझ्या विचारतील रोज ते;
तसेच सांग तू तिथे मनात जे करायचे.

'दिवाकरास' वाटते तसेच तू करून जा;
मनातलेच साधले असेच गे बघायचे.

6.

गतजन्मीचे पुण्यच माझे मला भेटली कविता-राणी;
तिला भेटण्या आधी होती माझी कविता उदासवाणी.

आली होती एक पाहुणी तिची सांगतो अता कहाणी;
आज जाहली पूर्ण मराठी जरी असे ती कधी इराणी.

रसिक देतसे दाद अशी की मैफिल सगळी रंगत जाते;
घरंदाज अन् चंचलशा या गझलेची मी गातो गाणी.

तिच्यामुळे हे जीवन माझे बदलुन गेले खरे सांगतो;
गझले खातर चार गावचे पिऊन आलो मी ही पाणी.

गझले पायी वेडा मजला ठरवुन गेले लोक येथले;
खरेच सांगा होती का हो अशी माणसे खरी शहाणी.

वृत्तामध्ये रदिफ काफिया अलामतीसह योजत जाणे;
सोपी भाषा सहज बांधणी हीच असे रे तिची निशाणी.
____________________________________________

दिवाकर चौकेकर,
गांधीनगर ( गुजरात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा