___________________सुशांत खुरसाले____तीन गझला________________

1.

किती हा चांगला रस्ता मिळाला चालण्यासाठी;
तुझे घर पाहिजे होते इथे रेंगाळण्यासाठी.

नकाशा काढला नाही मनाचा आमच्या कोणी;
किती चालायचे नक्की सिमांना शोधण्यासाठी?

जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या;
तुला स्वीकारले आहे...पुन्हा धिक्कारण्यासाठी!

तुझे हे सावरुन जगणे मनाला त्रास का देते?
करत जा हट्ट तू केव्हातरी या चांदण्यांसाठी.

कवडशांच्या दुकानांवर उन्हाचा लाभला पत्ता;
उन्हाला लाच द्यावी का धरा ओलावण्यासाठी?

मला वाचायचे होते पुन्हा माझ्याच ओळींना;
तुला बोलावले नव्हतेच नुसते लाजण्यासाठी!

2.

आशेचा वारा नाही, इच्छांचे वादळ नाही;
या डोहामध्ये आता कुठलीही खळबळ नाही.

दिवसाच्या गर्भामधला हा प्रकाश फसवा दिसतो;
अन् रात्रीच्या डोळ्यांना उरलेले काजळ नाही.

खंबीर कुणी ठरवावे, मी भरीव नाही इतका;
फुंकून सूर उमटावे इतका मी पोकळ नाही.

त्याच्या शब्दांची वाचा गेलेली आहे मित्रा;
ते झाड असे की ज्याच्या पानांची सळसळ नाही.

नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे;
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही.

तुमच्याच स्मृतींच्या दारी मी ठिबकत आहे नुसता,
पण माझ्यापर्यंत माझा आलेला ओघळ नाही.

3.

दुबळे प्रयत्न सगळे झाले करून आता,
जगणे तरी कळेना;पाहू मरून आता!

मी झिंगतोच आहे धुंदीमधे स्वतःच्या;
तू नेहमीप्रमाणे घे सावरून आता.

हृदयातुनी कधीही जमले न काढणे पण
काढून नाव टाकू ओठावरून आता.

खळबळ मनात माझ्या काहीच होत नाही;
वाटेल तेवढे तू घे बावरून आता.

बोलायला कुणाला लावू नकोस काही;
अंदाज घे कळीचा देठावरून आता !
______________________________
सुशांत खुरसाले ,पुणे
मो. नं. 7507269977

1 टिप्पणी: