_________________________अभिषेक उदावंत____तीन गझला_____________


1.

परिस्थितीने फक्त ते लाचार झाले;
पेटणारे रक्त थोडे गार झाले.

ही कमाई खूप झाली जीवनाची;
राहण्यासाठी मला घरदार झाले.

घट्ट केली मी मुळे मातीत तेव्हा... 
जीवनाचे झाड हिरवेगार झाले!

मंदिराच्या पायरीवर झोपलो पण
 देव सारे आतले अंगार झाले.

आैषधाचा दोष नाही यात काही;
जीव घेणारे किती आजार झाले.

हा किती मोठेपणा सांगू फुलांचा-
जाळल्या बागा तरिहि ते हार झाले!

2.

पोरांसाठी सुट्टी झालो;
पुस्तकातल्या गोष्टी झालो.

किती निरागस हसला मुलगा...
खेळण्यातली शिट्टी झालो!

बालपणीचा प्रेम राग हा :
दोस्ती झालो...कट्टी झालो!

हतबल झाली आई तेव्हा,
जेव्हा जेव्हा हट्टी झालो.

गळले नाही मडके माझे;
वेळोवेळी भट्टी झालो!

3.

प्रश्न आमचे सुटले नाही;
पेटुन कोणी उठले नाही!

इच्छा माझ्या हजार होत्या...
तितके तारे तुटले नाही!

मणी,डोरले,कुंकू गेले;
कर्ज आणखी फिटले नाही!

देव धावले अंगावरती;
सुतक म्हणालो फिटले नाही.

शाळा,पुस्तक,पाट्या रडल्या...
बंदुक हाती...पटले नाही!

मेल्यावरही वाट पाहिली;
डोळे सुद्धा मिटले नाही.
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा