_____________श्रीराम गिरी____दोन गझला__________


1.

तूर्तास ह्या सुखांचा अतिरेक फार झाला;
अन वैभवामुळे ह्या माणूस ठार झाला.

घटली कशी शुभेच्छा तुटला कसा जिव्हाळा-
का जीवनात इतका हा चढउतार झाला?

चिंतेत पाहतो मी घरट्यात पाखरे ही-
का जीव आमचा ह्या दुनियेस भार झाला?

भिजवून आसवांनी बघ धार लावली मी;
भाला उगाच नाही हा टोकदार झाला.

संभाळले असे तू माझ्या घरास येथे;
संसार तुजमुळे हा गुलजार फार झाला.

भेटू जरा गड्यांनो, निष्काम एकमेका;
अपुल्यामधील आता व्यवहार फार झाला.

2.

वेदना आक्रंदुनी ही ठार झाली;
शेवटी ह्या जाणिवांची हार झाली.

कोणता पर्याय आहे या जगाला;
प्रीत जर ना आपला आधार झाली.

का असूनी होत नाही व्यक्त कळकळ-
माणसे ही केवढी लाचार झाली.

दाद द्या मज सोसले हासून सारे;
एक ना इच्छा जरी साकार झाली.

वेगळी सापाहुनी नाहीच दुनिया;
यामुळे माझी गझल ही घार झाली.

झुंजलो आजन्म पाषाणासवे मी,
वाट म्हणुनी पर्वताच्या पार झाली.

ज्यात नव्हती वाटणी ह्या माणसाची;
तीच कविता जीवनाचा सार झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा